हमीद दलवाई - क्रान्तिकारी विचारवंत | HAMID DALWAI - KRANTAKARI VICHARVANT

HAMID DALWAI - KRANTAKARI VICHARVANT by पुस्तक समूह - Pustak Samuhशमसुदिन ताम्बोली - SHAMSUDDIN TAMBOLI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

शमसुदिन ताम्बोली - SHAMSUDDIN TAMBOLI

No Information available about शमसुदिन ताम्बोली - SHAMSUDDIN TAMBOLI

Add Infomation AboutSHAMSUDDIN TAMBOLI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लोकशाही राष्ट्रात असल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून वागून चालणार नाही.”' हे निर्भयपणाने जाऊन सांगत होता. एखाद्या धर्ममार्तडाच्या सभेत त्याच्यावर आघात तर होणार नाही ना, अशी त्याच्या मित्रांना भीती वाटायची. हमीदला ती फिकीर नसे. धर्मवेड्या वर्तमानपत्रांतून त्याच्यावर वाटेल ते आरोप होत. धर्मवेड्यांचा विरोध, तथाकथित राष्ट्रीय मुसलमानांचाही विरोध, मुसलमानांचे दोष दाखवल्यामुळे खूष होणारे हिंदू त्यांचे दोष दाखवले की नाराज!- हे सारे सहन करताना त्याने मूळ इहवादी भूमिकेशी कधीही तडजोड केली नाही. त्याबरोबरच वैचारिक आणि राजकीय मतभेदांना स्नेहभावनेच्या आडही येऊ दिले नाही. ह्या मार्गाने निघाला त्या वेळी चार इनेगिने सोबती सोडले तर “एकला चलो रे' म्हणतच निघाला होता. साथ होती ती त्याच्या जीवनध्येयाशी एकरूप झालेल्या त्याच्या पत्नीची. तिला मात्र संसारी असूनही एक प्रकारची अभूतपूर्व फकिरी. पत्करलेल्या ह्या माणसाच्या घरातली चूल पेटती ठेवायला लागत होती. आणि त्याबरोबर असल्या काफिराबरोबर घरसंसार करण्याबद्दल नाना प्रकारचे हाल सहन करावे लागत होते. अल्लाची महती गात हिंडणारे फकीर इस्लामला ठाऊक होते; पण माणसांच्या दुनियेत माणसांनीच न्यायाचे राज्य आणले पाहिजे, हे सांगत हिंडणारा फकीर धर्मवेड्या इस्लामी लोकांना मात्र नुसताच नवा नव्हता, तर नामंजूर होता. महाराच्या स्पर्शाने अब्रह्मण्यम्‌' म्हणणाऱ्यासारखे हमीदचा नामोच्चार कानी पडल्यावर तोबा तोबा करणारे मुसलमानच अधिक होते. हाती ज्ञानदीप घेऊन धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायांवर प्रकाश टाकणारा हमीद त्यांच्या दृष्टीने सैतान होता. पण असल्या धर्मसत्तेपुढे निमूटपणाने मान तुकवीत. वागणाऱ्या समाजातही त्याचे प्रकाशकिरण पोहोचले. एक एक करीत काही तरुण त्याच्या जोडीने चालू लागले. “मुस्लिम सत्यशोधक समाजा'ची स्थापना झाली. त्या समविचारी मित्रांपैकी कुणालाही हमीदने आपण नेता आणि ते अनुयायी अशी भावना येऊ दिली नाही. हमीदला नवा प्रेषित होऊन नवा पंथ स्थापन करायचा नव्हता. ह्या चळवळीचा रोख केवळ मुसलमान ख्रियांवरचा अन्याय दूर व्हावा एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. धर्माच्या नावाखाली सोसावे लागणारे अन्याय दूर व्हावे म्हणून चाललेल्या समाजप्रबोधनाच्या चळवळीचाच तो एक भाग होता. ज्या समाजात तो लहानाचा मोठा झाला त्या समाजातल्या खयांवर होणाऱ्या अन्यायांशी तो अधिक परिचित होता. डॉ. बाबा आढावांनी एक गाव : एक पाणवठा” ही चळवळ हाती घेतली. याचा अर्थ त्यांना ग्रामीण जीवनात बाकी सर्व काही उत्तम चालले आहे असे वाटते असा घ्यायचा नसतो. सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्याला पन्नास ठिकाणी आगी लागलेल्या दिसतात; त्यातली जी विझविता येईल ती विझवावी. हमीदला, मुसलमान लोक आजही मध्ययुगीन अंधश्रद्धांना कवटाळून बसल्यामुळे ८ ॥ हमीद दलवाई क्रांतिकारी विचारवंत आधुनिक जगात मागे पडत चालले आहेत हे दिसत होते. त्या समाजाची बौद्धिक आणि आर्थिक हलाखी दिसत होती. इज्जत, खानदान, मजहब, मुल्लामौलवींचे फतवे, जहन्रमची दहत अशा नाना तऱ्हेच्या भिंती उभ्या करून कोंडवाड्यात जगायला लावलेल्या ख्रियांची असहायता त्याला अस्वस्थ करीत होती. “जर इहवादी लोकशाही ध्येये प्रत्यक्षात आणायला हवी असतील तर भारतातल्या सर्व उदारमतवादी शक्‍ती एकत्र यायला पाहिजेत. त्यांनी अपक्ष भूमिकेवरून आणि कोणत्याही राजकीय सत्तासंपादनाचा हेतू मनात न ठेवता कार्य करायला हवे. हताश होऊन जे जे होईल ते ते पाहावे अशी भूमिका घेऊन चालणार नाही. माणसांना पश्शूचे जीवन जगायला लावणारे नियम कुणीही केलेले असले तरी ते बदलले पाहिजेत.” असा त्याचा ठाम निर्धार होता. वास्तविक, उगीचच कोणी कोणाच्या धर्मात ढवळाढवळ करू नये असली सोईस्कर भूमिका घेऊन, धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायांकडे काणाडोळा करून काँग्रेस पक्षाने आजवर चालवलेल्या मतपेटीच्या प्रणयाराधनाच्या तत्त्वशून्य राजकारणात शिरून, सत्तेचे स्थान स्वीकारून, लौकिक मानमरातब मिळवण्याची वाट हमीदला मोकळी होती. हमीदने ती नाकारली. विरोधकांचा राग ओढवून घेतला. त्याच्या जीवनातला प्रत्येक दिवस नवी आव्हाने स्वीकारण्याचा दिवस होता. अशी आव्हाने स्वीकारत चाललेला हमीद भेटला आणि बोलायला लागला की वाटे, याचे हे बोलणे इतर कशासाठी असले-नसले तरी स्वत:च्या मनाच्या उन्नयनासाठी ऐकत राहावे. सार्वजनिक हिताच्या कार्यात धडपडणारी माणसे भेटतात. त्यांचा त्याग मोठा असतो; पण त्यांच्यापैकी अण्णासाहेब सहस्रबुद्धे किंवा एस. एम. जोशी यांच्यासारखी पाच-दहा माणसे वगळली तर अशा मंडळींच्या बोलण्यात निष्क्रिय समाजाविषयी एक प्रकारचा किरकिरीचा किंवा तक्रारीचा सूर असतो. हमीदच्या बोलण्यातून हा सूर उमटलेला मला आढळला नाही. निराशेचे असंख्य क्षण त्याच्या ह्या तळमळीच्या जीवनात आले असतील. त्यानेच एक आठवण सांगितली होती : नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वीच्या निवडणुकीच्या काळात त्याला एक मुसलमान गृहस्थ भेटले, ते म्हणाले, “अहो कशासाठी चालल्या आहेत या निवडणुका? कशाला हा सगळा प्रचार? लवकरच इथे आयुबखान येऊन हे सगळं मिटवून टाकणार आहेत.”' हमीद म्हणाला, हे ऐकल्यानंतर मी माझ्या मनाचा तोल जाऊ दिला नाही. तो गृहस्थ अशिक्षित होता. मला दु:ख झाले ते ह्या काळातही मुसलमानांची मने त्या कालबाह्य आणि मध्ययुगीन कल्पनांच्या जाळ्यातच कशी अडकवून ठेवली आहेत या गोष्टीचे. हमीदच्या लिखाणात किंवा भाषणात चुकूनही कधी सभ्यतेची मर्यादा सुटली नाही. वास्तविक, कसली भयंकर झुंज तो घेत होता! पण त्याची भाषणे ऐकताना एक कमालीचे आकर्षक उमदेपण त्याच्या रूपाने वावरत आहे असे वाटायचे. हमीद : एक श्रेष्ठ प्रबोधनकार ॥ ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now